ठाणे : येथे परिवर्तन न्यास आणि कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ‘श्रावण-प्रबोधन’ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प नुकतेच पार पडले. यंदा या व्याख्यानमालेला पाच वर्षे पूर्ण झाली.
‘देशाच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करून, व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन सकल समाजाला शिक्षित केल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही,’ असे मत अर्थतज्ज्ञ, विचारवंत व राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ‘देशातील सद्यस्थिती’ या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमामध्ये नगरसेवक संजय भोईर, उषा भोईर, ‘परिवर्तन न्यास’चे प्रमुख समन्वयक मोहन पाटील, डॉ. ए. डी. सावंत, गणेश नाईक, भरत ठाकरे, शांताराम पाटील, पी. सी. पाटील या वेळी उपस्थित होते. मोहन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाचे द्वितीय सत्र रविवारी, सहा ऑगस्ट रोजी असून, त्यात विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांचे ‘शोध सुखाचा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तृतीय सत्र शनिवारी, बारा ऑगस्ट रोजी होणार असून, त्यात समाजसेवक व समीक्षक डॉ. विश्वंभर चौधरी यांचे ‘घटनात्मक राष्ट्रवाद’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी, २० ऑगस्ट रोजी ‘आयबीएन लोकमत’चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांचे ‘बदलती प्रसारमाध्यमे, बदलता समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमाविषयी :दिवस : रविवार, सहा ऑगस्ट २०१७
वेळ : सायंकाळी चार ते साडेपाच
व्याख्यान : डॉ. विजया वाड
विषय : ‘शोध सुखाचा’
दिवस : शनिवार, १२ ऑगस्ट २०१७
वेळ : सायंकाळी चार ते साडेपाच
व्याख्यान : डॉ. विश्वंभर चौधरी
विषय : ‘घटनात्मक राष्ट्रवाद’
दिनांक : रविवार, २० ऑगस्ट २०१७
वेळ : सायंकाळी चार ते साडेपाच
व्याख्यान : महेश म्हात्रे
विषय : बदलती प्रसारमाध्यमे, बदलता समाज
स्थळ : हायलँड रेसिडेन्सी हॉल, कापूरबावडी, ठाणे